१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही   

नवी दिल्ली : आता आधार जोडणीशिवाय रेल्वेचे तात्काळ तिकीट मिळणार नाही. १ जुलैपासून नवीन नियम लागू होणार आहे. याबाबतची घोषणा रेल्वे मंत्रालयाने बुधवारी केली. या संदर्भात मंत्रालयाने सर्व विभागांना कळवले आहे. 
 
रेल्वेचे तात्काळ तिकीट काढताना मोठी गडबड होत असल्याचे एका पाहणीतून समोर आले. तात्काळ तिकिटांचे आरक्षण सुरू केल्यानंतर एका मिनिटातच सर्व तिकिटे आरक्षित होतात. परिणामी, तात्काळ सुविधेचा कोणताही लाभ सर्वसामान्य प्रवाशांना होत नाही. त्यामुळे रेल्वे मंडळाने याबाबत ठोस पावले उचण्यास सुरुवात केली आहे. १ जुलैपासून फक्त आधार प्रमाणित वापरकर्त्यांना इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळ आणि अ‍ॅपद्वारे तात्काळ तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. तर, १५ जुलैपासून तात्काळ तिकीट काढण्यासाठी आधार आधारित ‘ओटीपी’ प्रमाणीकरण देखील अनिवार्य केले जाईल. वातानुकूलित डब्यांसाठी सकाळी १० वाजता आणि विनावातानुकूलित डब्यासाठी सकाळी ११ वाजता तात्काळ तिकीट आरक्षित होण्यास सुरुवात होते. परंतु, तात्काळ तिकिटे काढण्यास सुरुवात केल्यानंतर एका मिनिटांतच सर्व तिकिटे आरक्षित होऊन, दुसर्‍या मिनिटांला तिकीट प्रतीक्षा यादीत जातात. 
 

 

Related Articles